वाढदिवस कसा साजरा करावा

थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा.

  • हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.
  • वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्याचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे). त्या बालकाला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
    अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
    सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान करावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवेद्य दाखवावा. बालकाला औक्षण करून ओवाळावे. त्यानंतर
  • दोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या - त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. कुलदेवतेला विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर. उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
टीप:
  • आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे. आपली संस्कृती ही अज्ञानाकडुन ज्ञानाकडे, अंधारातुन प्रकाशाकडे नेणारी आहे.
  • केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.