बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई आणि वडिल आहेत. मुल जन्मल्यापासुनच त्याच्या सर्वात जवळचे कोणी असेल तर ते त्याचे आई – वडिल असतात. त्याच्या विकासात कारणीभूत अनेक घटकांपैकी पालक हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तेव्हा सर्वच पालकांनी सर्वात पहिले मनाशी खुणगाठ बांधावी की त्यांच्यावर अवलंबुन एक जीव विकसित होत होत एक मानव म्हणुन विकसित होणार आहे. या 'मानव' संज्ञेमागे खुप मोठं असं अर्थपूर्ण विश्वच आहे.
बालकाच्या जन्मापासुन ते शाळेत जाण्यापर्यंत आपल्या आई वडिलांजवळच राहणारे बालक त्याचे आई - वडिल काय बोलतात, काय खातात, कसं वागतात हे बघतच मोठं होतात. वय वर्षे ५ पर्यंत त्यांच्या मेंदुतील पेशी ज्यास नुरॉन्स म्हणतात त्यांची वाढ होत असते. मुले आपल्या इंद्रियांना समजुन घेत त्यांचा वापर शिकत असतात. त्यातुन चालणं, बोलणं, खाण-पिणं, हाताने वस्तु उचलनं यासारखी कौशल्यं विकसित होतात. मुलं लहान असतांनाच त्यांच्या विकासात मदत करतांना त्यांची विविध कौशल्य विकसित होण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करायला हवे. मुल रांगायला, चालायला लागल्यावर ते सतत काहीना काही वस्तु हाताळतात. खरतर त्यांना सतत काहीना काही काम करायचं असतं, तेव्हा त्यांच्या कौशल्यात भर पडेल असं त्यांना करण्यासाठी दिल तर अधिक चांगलं. त्यांना लाकडाचे ठोकळे, पेपर यासारखं काही देउन त्यातुन काहीना काही करायला लावा. मुलांना शिकवतांना हळुहळु केंद्रात जाण्याची सवय लावली तर केंद्राचा लळा त्यांना लहानपणापासुन निश्चित लागेल. यावयात मुले सर्वकाही हाताळण्याचा, सर्व काही जाणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यात तीव्र गहनशीलता असते. त्यामुळे आपण जे काही त्यांना शिकवु, तसं ते शिकत जातात.
शाळेत जायला लागल्यावर थोड्याप्रमाणात बाहेरच्या जगाचा संबंध आलेल्या बालकाच्या विकासात त्याच्या आई वडिलांबरोबर या जगातील इतर घटकांचाही अंतर्भाव व्हायला लागतो. तरिही त्याचे पालकच त्याचे मोठे मार्गदर्शक असतात. वय वर्षे ५ ते १२ या काळात मुलं समुह जीवन जगण्यास नुकतेच शिकत असतात. त्यांच्यात देण्याची सवय लागावी, समुह जीवनासाठी आवश्यक मैत्री, सद्भाव त्यांच्यात जागृत व्हावे यासाठी प्रयत्न करावे. या कालात त्यांना विविध कौशल्ये जसं स्वतःच्या हाताने स्नान, स्वच्छता, पोशाख घालणे, यासारखी स्वावलंबनात्मक कौशल्ये, चेंडुसोबत खेळता येणे, विविध खेळ खेळता येणे यासारखी क्रीडात्मक कौशल्ये आणि परोपकार, शालेय स्नेहसंमेलनात भाग घेणे यासारखी सामाजिक कौशल्ये शिकवावी. या काळापर्यंतच मुलांकडुन अभ्यास करुन घ्यावा लागतो.
त्यानंतर कुमार अवस्थेत मुलं पदार्पण करतात. वय वर्ष १३ ते १५ या कालात मुलांमध्ये भावनिक स्थित्यंतर घडुन येतात. खरतर हा काळ विकासाच्या दृष्टीने आणि मानवी संवेदना जागृत होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा काळ असतो. या काळात मुलांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेच असतं. या काळात मुलांचा अभ्यास घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्याशी संवाद साधणं कारण अभ्यास कसा करायचा हे त्यांना कळायला लागलेलं असतं पण भावनांवर नियंत्रण कस मिळवावं, विचारांना कश्या पध्दतीने दिशा द्यावी, व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय, ते कसं विकसित करावं याविषयी मार्गदर्शनाची त्यांना गरज असते. या काळात मुलं विचार करायला लागतात. त्यांच्या विचारांना दिशा देणं आवश्यक असतं नाही तर ते भरकटण्याची शक्यता असते. आपल्या कौटुंबिक स्थितीची इतरांबरोबर तुलना करणं, आपल्या पालकांची ईतरांबरोबर तुलना करणं, वाईट मुलंची संगत यापासुन त्यांना वाचवायला हवं. पालकांच्या वैयक्तिक भाव-विचारांचा, त्यांच्या सवयी यांचा मुलांवर फार परिणाम या काळात बालकांच्या आयुष्यावर होत असतो. निश्चितच चांगल्या सवयी मुलांना आपलंस करतात, त्यांना वाईट सवयींमुळे मुले दुरावतात. तेव्हा घरातील वातावरण नीट ठेवणं हे पालकांच परम कर्तव्या आहे. फक्त मुलांना चांगल्या शाळांमध्ये आणि चांगल्या ट्युशन्समध्ये टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपले, हा गैरसमज पहिले मनातुन काढला पाहिजे.