आपल्या मातापित्यांच्या भावी आशाआकांक्षा आपल्या बालकांवर केंद्रीत असतात. मुले ही मातापित्यांचे सर्वस्व तर असतेच त्याचबरोबर ते राष्ट्राची संपत्ती आणि समाजाचा अमुल्य ठेवा असतो. शिक्षणाच्या माध्यमातून बालकांतील अंतर्निहित शक्ती, कौशल्ये आणि गुणांचा विकास व्हावा जेणेकरुन वर्तमान स्पर्धात्मक युगात ती सहजपणे यशस्वी सामना करु शकतील. आपला परिवार, समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या संदर्भात आपल्या जबाबदार्या सांभाळून आदर्श नागरिक म्हणून उद्दिष्टपूर्ण जीवन ते जगू शकतील.
श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बालसंस्कार कार्याद्वारे बालकांचे नितीमुल्य शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार व चारित्र्य संवर्धन करणे हा एक मुख्य उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करुन त्यांना आदर्श नागरिक कसे घडविता येईल याचे परखड मार्गदर्शन सद्गुरु प.पू. मोरे दादा करीत. पालकांनी आपल्या अपत्यावर सतत लक्ष दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. विद्यार्जन करतांना आपल्या अंगी नम्रता असावी असा त्यांचा कटाक्ष असे. संस्कारांची सुरुवात घरातूनच होते असे सद्गुरु प.पू. मोरे दादांचे मत होते. जीवनाचे मूलभूत तत्वज्ञान समजावून देऊन बालकांना व युवकांना पुढे नेण्याचा त्यांचा अट्टाहास होता आणि त्यातूनच प्रत्येक केंद्रात बालसंस्कार केंद्र सुरु करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि विशाल दृष्टिकोन दिसून येतो. निकोप व सुसंस्कारित पिढी तयार करण्यासाठी बालमनावरच संस्कार बिंबविले पाहिजे ही सद्गुरु प.पू. मोरे दादांची आर्त तळमळ होती. यातूनच बालसंस्कार कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
बालसंस्कार कार्याद्वारे संस्काराची चळवळ उभी करुन समाज घडविण्याचं, राष्ट्र उभारण्याच कार्य हजारो सेवा केंद्रांमार्फत घडत आहे. कारण,
बालसंस्कार विभागाच्या या संकेत स्थळावर विद्यार्थी, पालक आणि शिक्षक – बालसंस्कार प्रतिनिधी या तीनही सुत्रांना एकत्र गुंफुन त्याद्वारे समाजाची आणि राष्ट्र उभारणीची सेवा राष्ट्र देवो भव संकल्पनेआधारे समर्पित करत आहोत. विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांना या संकेतस्थळावर मार्गदर्शक ज्ञानभांडार उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. बालसंस्कार केंद्र कसे चालवावे, कोणते उपक्रम राबवावे यासह अनेक विषयांवर बालसंस्कार प्रतिनिधींना मार्गदर्शन यातुन करण्यात येणार आहे. पालकांसाठीही अनेक माहितीपूर्ण लेख तसेच मुलांची घ्यावयाची काळजी, मुलांसोबत वागतांना काय काळजी घ्यावी यासह अनेक महत्वाच्या विषयांवर माहिती आपणासमोर मांडण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी तर हे संकेतस्थळ म्हणजे ज्ञान आणि उपक्रमांचा मोठा खजिनाच आहे. तेव्हा आपले अभिप्राय, सुचना, लेख, विविध उपक्रमांचे फोटो सदैव स्विकार्य आहे.
सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.
बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.